बारामती, सोमेश्वरनगर, भिगवण, दौंडमध्ये ढगफूटी   

पुणे-सोलापूर महामार्ग पाण्याखाली; घऱांमध्ये शिरले पाणी    

बारामती/सोमेश्वरनगर/ भिगवण/ दौंड , (प्रतिनिधी) : बारामती, सोमेश्वर नगर, भिगवण, दौंड परिसरात रविवारी ढगफूटी होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पिंपळी कालव्याला पडलेल्या भगदाडामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले असून शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
 
शेतकरीवर्गावर या नैसर्गिक आपत्तीमुळे दुहेरी आघात झाला आहे. अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने रहिवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र, प्रशासनाने वेळीच मदतकार्य राबविण्यात सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून मदत आणि पुनर्वसन कार्य सुरू असून, पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीच्या काळात प्रशासनाशी ९९२२४ ४७८१२ व ९३५९८०७४९२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.
 
सोमेश्वरनगर परिसरात शेतांना तलावाचे स्वरूप आले असून ओढे, नाले, चार्‍या दुथडी भरून वाहू लागले आहेत. यामुळे शेकडो एकर क्षेत्रावरील पालेभाज्या, फळभाज्या अशी तरकारी पिके नष्ट झाली आहेत. परिसरातील टोमॅटो, वांगी, कारली, दोडका, काकडी अशा प्रमुख फळभाज्या आणि कोथींबीर, मेथी, पालक, कोबी, फ्लॉवर, मिरची पालेभाज्या जवळपास संपल्यात जमा आहेत. ढगफूटीमुळे सर्व पिके हातची गेली आहेत. त्यामुळे  सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
 
भिगवण शहराच्या अनेक भागांत पाणी साचले असून, नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे हाल झाले आहेत. थोरात नगर मध्येे अक्षरशः पाण्याचे लोंढे वाहत होते. काही ठिकाणी भिंती पडल्या असून रस्ते खचले आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहने अडकून पडली. भिगवण येथील संपूर्ण  बस स्थानकामध्ये पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. सर्व वाहतूक व्यवस्था काही काळ विस्कळीत झाली होती. 
 
दौंड तालुक्यातील शेवटचे गाव असणार्‍या स्वामी चिंचोलीजवळ पुणे - सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्याचे दिसत आहे. पुराच्या पाण्यामध्ये एक चारचाकी वाहन वाहून गेले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्वामी चिंचोली या गावचे आरोग्य उपकेंद्र आणि माहामार्गावरील अनेक दुकाने पाण्याखाली गेली आहेत. गावातील अनेक वाड्यावस्त्यांमध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे गाव आणि महामार्गचा संपर्क तुटला आहे.

Related Articles